नांदेड – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या विरोधात तसेच शोषणाच्या, दडपशाहीच्या, पारतंत्र्याच्या, लाचारीच्या आणि हे सर्वच निर्माण करणाऱ्या सत्ताकेंद्राच्या विरोधात लढा दिला. जात धर्म विरहित मानवी समुहाची पुनर्रचना करणाऱ्या धम्माचे अनुसरण केले. त्यामुळेच बाबासाहेबांच्या आयुष्यभरातील अथक संघर्षातून निर्माण झालेल्या भारतीय संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी माणूस नावाच्या सौंदर्याची निर्मिती केली असे प्रतिपादन भंते पंय्याबोधी थेरो यांनी केले. ते महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित तालुक्यातील खुरगाव – नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात संपन्न झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, भंते मेत्तानंद, भंते धम्मकीर्ती, भंते चंद्रमणी, भंते संघरत्न, भंते धम्मशिलो, भंते सुदर्शन, भंते श्रद्धानंद, भंते सुभद्र, प्राचार्य विकास कदम, ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी, नांदेड आकाशवाणीचे शंकर नरवाडे, साहित्यिक अनुरत्न वाघमारे, समीक्षक गंगाधर ढवळे, पांडूरंग कोकुलवार, नागोराव डोंगरे, मारोती कदम, कैलास धुतराज, कवयित्री रुपाली वैद्य वागरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त खुरगाव येथे ‘महामानवाला कवितेतून अभिवादन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन नांदेडचे पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले. त्यानंतर तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. यावेळी बोलतांना शेवाळे म्हणाले की, समाजातील अनिष्ट विचार, रूढी नष्ट झाले पाहिजेत. अंधश्रद्धेला मूठमाती दिली पाहिजे. अनाचार वाढता कामा नये. सर्वांनी निकोप समाजाच्या निर्मितीसाठी झटले पाहिजे. हे काम श्रामणेर प्रशिक्षण केंद्र करीत आहे, ही समाधानाची बाब आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक उपासकांनी ही सांस्कृतिक चळवळ वाढवली पाहिजे आणि ती पुढे नेली पाहिजे. साहित्यिक अनुरत्न वाघमारे यांनी दान पारमिता आणि संस्कारविधी याविषयी माहिती दिली. यावेळी उपासकांनी याचना केल्यानंतर भंते पंय्याबोधी यांनी उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले आणि उपस्थित बौद्ध उपासक उपासिकांना धम्मदेसना दिली.
सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कविसंमेलनात पंचफुला वाघमारे, थोरात बंधू, अनिकेत कुलकर्णी, विकास कदम, शंकर नरवाडे, राजेश गायकवाड, मारोती कदम, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, रणजीत गोणारकर, रुपाली वैद्य वागरे, नागोराव डोंगरे, कैलास धुतराज, निवृत्ती लोणे, गंगाधर ढवळे, सुभाष लोकडे, सुदामा हिंगोले, पांडूरंग कोकुलवार, अनुरत्न वाघमारे यांनी सहभाग नोंदवला. सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने आयोजित कविसंमेलनात तथागत गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा गौरव करणाऱ्या एकापेक्षा एक सरस कवितांचे सादरीकरण करुन उपस्थितांना अंतर्मुख केले. सर्वच कवींनी कवितेतून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी श्रामणेर प्रशिक्षण केंद्रातील शिबिरार्थी भंते सुगत, भंते सुभद्र, भंते महानाम, भंते अश्वजित, भंते सारीपुत्र, भंते सुमेध, भंते शिलभद्र यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी कैलास धुतराज यांनी केले. प्रास्ताविक साहित्य मंडळाचे महासचिव पांडूरंग कोकुलवार यांनी तर आभार एकनाथ कार्लेकर यांनी मानले.
सप्तरंगी साहित्य मंडळाचे भोजनदान ; बांधकामासाठी विटदान
सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने उपस्थित भिक्कू संघ, श्रामणेर प्रशिक्षण शिबिरार्थी तसेच उपस्थित बौद्ध उपासक उपासिकांना भोजनदान देण्यात आले. तसेच भिक्कू निवास आणि प्रशिक्षण केंद्राच्या इमारत बांधकामासाठी पाच हजार विटांचे दान देण्यात येणार असल्याचे सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आले. यावेळी मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, उपाध्यक्ष नागोराव डोंगरे, सहसचिव कैलास धुतराज, कार्याध्यक्ष मारोती कदम, कोषाध्यक्ष गंगाधर ढवळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शंकर गच्चे, बाबुराव पाईकराव, साहेबराव नरवाडे, दिनेश पटने, आप्पाराव नरवाडे, नागोराव नरवाडे, रवी नरवाडे, विकी महाराज, राजू नरवाडे, प्रा. विनायक लोणे, सुनील नरवाडे, पप्पू नरवाडे, कृष्णा नरवाडे, राजरत्न नरवाडे, सुनंदा वाघमारे, संध्या कांबळे, स्वराली वैद्य, सूरज नरवाडे, राहूल नरवाडे, सूर्यकांत नरवाडे, यांनी परिश्रम घेतले.
Leave a Reply