मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरवल्यानंतर राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळालं. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या भेटीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राष्ट्रपती महोदयांना लिहिलेलं पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
‘राष्ट्रपतींना पत्र, पंतप्रधानांची भेट घेणार’
गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, त्याबाबतच राज्यपालांना भेटलो. निकालामध्ये म्हटलंय आरक्षणाचा अधिकार राज्याचा नाही तर केंद्राचा आहे. त्यामुळे आम्ही केंद्राला आणि राष्ट्रपतींना आमच्या भावना कळवण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली. त्यावेळी राज्यपालांनी आपल्या भावना केंद्रापर्यंत पोहोचू, असं सांगितल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आम्ही लवकरच पंतप्रधानांना भेटू. महाराष्ट्राच्या विधीमंडळाने एकमताने निर्णय घेतला होता. त्याला विरोध झाला. पण आता जो निर्णय झाला तो जनतेचा आहे. समाजाला न्याय मिळाला पाहिजे. जसं आज राज्यपालांना पत्र दिलं, तसं पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांनाही एक पत्र देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
Leave a Reply