मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनी पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ,मनसे अध्यक्ष राज ठाकरे , चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण दिलं आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन आवश्यक असल्याचा पर्याय सरकारकडे आहे. मात्र त्याबाबत विरोधी पक्षांची भूमिका काय हे जाणून मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तीन आठवड्यांच्या कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळतोय. राज्यातील प्रत्येक शहरात दररोज हजारांच्या घरात कोरोना रुग्ण दाखल होत आहेत. मृत्यूदरही वाढल्याने स्मशानभूमी फुल्ल झाल्या आहेत. आणि त्यामुळे कधी एकाच सरणावर 8 मृतदेह तर कधी एकावेळी 22 मृतदेहांना अग्नी द्यावा लागतो. त्यामुळेच कडक पावलं उचलण्याची गरज असल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय.
लसींचा साठा संपला
राज्यातील कोरोनाची परिस्थिती भीषण आहे. त्यातच राज्यातील लसींचा साठाही संपल्यात जमा आहे. केंद्राकडून लस दिली जात नसल्याचा आरोप राज्य सरकारमधील नेते करत आहेत. त्यातच ऑक्सिजन बेड्स, रुग्णवाहिका यांची कमतरता भासू लागली आहे. त्यातच राज्यातील एका कॅबिनेट मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं हा लॉकडाऊनचा इशारा असू शकतो असं मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
लोकल ट्रेनलाही ब्रेक
पुढच्या लॉकडाऊनमध्ये कदाचित मुंबईच्या लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनला पुन्हा ब्रेकही लागू शकतो. कारण, लोकलमध्ये सर्वाधिक वेगाने कोरोना परसतोय, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यातच लोकलची गर्दी नियंत्रणात येत नसल्याने लोकल बंद करण्याचा विचारही सरकार करत असल्याचं बोललं जात आहे.
एकूणच सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करता सध्या निर्बंधात सूट तर नाही, मात्र निर्बंध अजून कडक केले जाऊ शकतात. मात्र, हे करत असताना सामान्यांच्या जीवनावर कमीत कमी परिणाम होईल, अर्थचक्र धीम्या गतीने का होईना फिरत राहिल, हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे.
MPSC परीक्षा पुढे ढकलली
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी म्हणजे ११ एप्रिल २०२१ रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची संयुक्त पुर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
राज्यातील कोरोना स्थिती लक्षात घेऊन या परीक्षेच्या तारखा एमपीएससी मार्फत नव्याने घोषित केल्या जातील असे ही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि विद्यार्थी आणि विविध राजकीय पक्षांचे यासंदर्भातील मत आणि मागण्या विचारात घेऊन हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.
Leave a Reply