महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा आणि पात्रता परीक्षांच्या पेपरफुटीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. उद्या (रविवारी) होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पेपर लीक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभागाने तातडीने पावले उचलत उद्या होणारी ही परीक्षा रद्द (स्थगित) करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा ही परीक्षा कधी होणार, याची वाट पाहावी लागणार असल्याने परीक्षार्थींमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्या होणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेच्या आधीच ठाणे परिसरामध्ये पेपर फुटल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना त्यांच्या सूत्रांकडून मिळाली होती. काही टोळ्या पैसे घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत हा पेपर पोहोचवत असल्याचा सुगावा पोलिसांना लागला होता. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सापळा रचून ज्या संशयितांकडे हा पेपर होता, त्यांच्यापर्यंत पोहोचून प्रश्नपत्रिका जप्त केल्या. हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ शिक्षण विभागाला या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती दिली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. ताब्यात घेतलेले हे लोक नेमके कोण आहेत? त्यांच्याकडे हा गोपनीय पेपर कसा आणि कुठून आला? यात मोठ्या कोचिंग इन्स्टिट्यूट चालवणाऱ्या लोकांचा किंवा शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचा हात आहे का? या सर्व बाजूंचा तपास पोलीस करत आहेत. सध्या त्यांची नावे गुप्त ठेवण्यात आली असून, सखोल चौकशीनंतर या रॅकेटचा मुख्य सुत्रधार समोर येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
आधीच या टीईटी परीक्षे संदर्भात गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे मोठी चर्चा रंगली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या गोंधळामुळे ही परीक्षा आधीच वादाच्या आणि चर्चेच्या केंद्रस्थानी होती. अशातच आता थेट पेपर लीक झाल्याने शिक्षण विभागाने ही परीक्षा तात्काळ स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाकडून काही वेळातच या संदर्भातील अधिकृत ‘प्रेस नोट’ आणि सूचना जारी केली जाणार आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेशही शिक्षण मंत्रालयाने दिले आहेत.
उद्याच्या परीक्षेसाठी राज्यभरातून लाखो विद्यार्थ्यांनी जय्यत तयारी केली होती, मात्र ऐन परीक्षेच्या आदल्या दिवशी पेपरफुटीमुळे परीक्षा स्थगित झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणाची आता शिक्षण विभाग आणि पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे. राज्यात वारंवार अशा प्रकारे शासकीय आणि पात्रता परीक्षांचे पेपर लीक होणे ही अत्यंत गंभीर बाब असून, प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ खेळणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.




















