वंदे भारत एक्सप्रेसच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रणावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये आज चांगलाच राडा झाला. खासदार इम्तियाज जलील यांचं कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत नाव न टाकल्याने एमआयएमचे कार्यकर्ते आक्रमक झाले. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरी देखील एमआयएमचे कार्यकर्ते रेल्वे अडवण्यावर ठाम होते. दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते देखील संभाजीनगर स्टेशन परिसरात तळ ठोकून आहेत. या गोंधळामुळे पोलिसांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.

जालना-मुंबई मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार, अशी घोषणा काही दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली होती. त्यानंतर जालना ते मनमाड रेल्वेलाईच्या विद्युतीकरणाचं काम हाती घेण्यात आलं. काम पूर्ण झाल्यानंतर या गुरुवारी मार्गावर वंदे भारतची ट्रायल देखील घेण्यात आली.
शनिवारी ३० डिसेंबरला वंदे भारत लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला. मात्र, या निमंत्रण पत्रिकेत जलील यांचं नाव न टाकल्याने एमआयएम कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. खासदार जलील यांनी सुद्धा यावरून चांगलाच संताप व्यक्त केला.
भारतातील ट्रेन भाजपच्या मालकीच्या नाही, असं म्हणत वंदे भारत ट्रेन रोखून दाखवू असाच इशाच त्यांनी रेल्वेमंत्र्यांना दिला. यानंतर शहरात एमआयएम आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांची देखील चांगलीच दमछाक झाली.




















